पुणे : दिवंगत साहित्यिक शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या मृत्युंजय, छावा आणि युगंधर या कादंबऱ्यांच्या प्रकाशनावरून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नेमलेल्या ‘लवाद मंडळाने (Arbitration Tribunal Court) संपूर्ण केसचा ऊहापोह करून पावणेचार वर्षांनंतर अंतिम निर्णय कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या बाजूने दिला आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे ऋतुपर्ण अनिरुद्ध कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
‘लवाद मंडळाने दिलेल्या निकालानुसार, शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या उपरोल्लेलिखित पुस्तकांचे मराठी प्रकाशनाचे सर्व अधिकार स्वामित्व अधिकार संपेपर्यंत कॉन्टिनेन्टल प्रकाशनाकडेच राहतील. ‘कॉन्टिनेन्टल’खेरीज अन्य कोणत्याही प्रकाशकाला हे साहित्य प्रकाशित आणि वितरित करता येणार नाही. शिवाजी सावंत यांच्या वारसांनाही ही पुस्तके अन्य प्रकाशनामार्फत मुद्रित करण्यास अगर विक्री करण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यात आला आहे,’ अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
‘कोर्टाच्या निर्णयानुसार पुस्तक विक्रेत्यांनाही संबंधित पुस्तके कॉन्टिनेन्टल प्रकाशनाव्यतिरिक्त अन्य कोणाकडूनही विक्रीसाठी घेता येणार नाहीत. तसे केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल,’ असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
‘गैरमार्गाने प्रसिद्ध केलेल्या प्रती काही विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत. अशांवर पूर्वीप्रमाणेच कायदेशीर कारवाई केली जाईल. आम्हाला मिळालेला वारसा आम्ही सक्षमपणे पेलूच; शिवाय पुढेही उत्तमोत्तम साहित्य प्रकाशित करून लोकांपर्यंत पोहोचवत राहू,’ अशी ग्वाहीही कुलकर्णी यांनी दिली.